मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

अपेक्षा



                        दररोजच्या आपल्या Lifestyle मध्ये, अगदी सहजतेने कुठली गोष्ट घडत असेल तर ती कोणती असा प्रश्न जर स्वतःलाच  विचारला तर बऱ्याच जणांना मान्य होईल असं उत्तर म्हणजे "अपेक्षा" हेच असावं. खूप साधी गोष्ट असते एखादी, ती करावी, की करू नये, कोणी करावी, कोणी करू नये, का करावी आणि का करू नये अशा छोट्या छोट्या अपेक्षा असतात आपल्याला. त्यातही पाहायला गेलं तर दोन प्रकारच्या अपेक्षा आपल्याला पाहायला मिळतील. एक म्हणजे स्वतःकडून असणाऱ्या आणि दुसऱ्या म्हणजे आपल्या आप्तेष्ट,स्वकीय, मित्र-मैत्रिणी वा अन्यांकडून असणाऱ्या अपेक्षा. न्याय कुठल्या अपेक्षांना द्यायला पाहिजे हे सर्वश्रुत आहे. आपणच स्वतःकडून असणाऱ्या अपेक्षा पूर्ण कराव्या. किंबहुना आपणच स्वतःकडून असणाऱ्या अपेक्षा डोळसपणे बघाव्या, त्यांचा विचार करावा, आणि नसतीलच तर आधी त्या ठेवाव्या. सर्वश्रुत असणाऱ्या गोष्टी सर्वकृत असतीलच असं नव्हे. किंबहुना बहुतांश वेळी त्या नसतातच. आता आपल्या सगळ्यांना WhatsApp, Facebook इ. Social Media वर म्हणा किंवा एकंदरीत त्या तळहाताएवढ्या Mobile वर दिवसाचा किती वेळ जातो हे माहितीच आहे. तो जाऊ नये, त्याचे तोटे, वाईट परिणाम आज त्याच्याच मदतीने सर्वश्रुत आहेत. पण करण्याची वेळ येते तेव्हा आपण मागे हटतो. म्हणून हे सर्वकृत होत नसावं. कारण सुरुवात आपण करूया ही आपण स्वतःकडूनच "अपेक्षा" ठेवत नाही हे ही तितकंच खरं म्हणायचं.
                        आपल्या चालीरीती, परंपरा, आपण पाहिलेले समाजजीवन, ह्या समाजातील आपल्यासोबत   वावरणारा वर्ग ह्यांचा आपल्यावर इतक्या मोठ्या प्रमाणावर पगडा बसलाय की थोडंसं त्यांच्यापेक्षा वेगळं  वागलं की ते आपल्याला वाळीतच टाकणार आहेत असं आपण अपेक्षित धरून चालतो. म्हणून आपण काय करावं हे सोडून समोरच्याने काय करावं ही साधारण अपेक्षा आपण करतो. आणि हाच आपल्या समाजाचा आजचा स्वभाव बनलाय , दृढ होत चाललाय. जेव्हा मी ह्या सगळ्याचा खोलात जाऊन Generalised विचार केला तेव्हा मला जाणवायला लागलं की आपले सुख, दुःख, आनंदाचे क्षण, हे सगळे दुसऱ्यांवरच अवलंबून आहेत. ते आपल्या अपेक्षेप्रमाणे वागले तर आपल्याला आनंद होईल. आपल्या अपेक्षेप्रमाणे नाही झालं तर आपल्याला वाईट वाटेल. आपला आनंद वा समाधान दुसऱ्यांच्या कृतीवर विसंबून आहे हे म्हणजे असं झालय की स्वतःला भूक लागल्यावर दुसऱ्यांनी जेवण केलं तरी पोट मात्र आपलंच भरणार. आज असं होताना आपण बघतोय, अनुभवतोय, अगदी छोट्या गोष्टींमध्येही.
                       मग अपेक्षा करणंच चुकीचं का असा प्रश्न मला पडला. उत्तरही मिळालं. वेळ दिला की सगळे उत्तरे आपल्याला मिळतात फक्त त्यांना त्यांचा वेळ दिला पाहिजे. घाई न करता.  अपेक्षा हा मानवी स्वभावाचा एक अंगभूत गुण आहे. म्हणून अपेक्षा करणं हे चूक नव्हेच. अगदी स्वतःकडूनही आणि दुसऱ्याकडूनही. पण आपण त्या अपेक्षेचं ओझं लादतो.  समोरच्याने अश्याच पद्धतीने, अशाच प्रकारे पुढे गेलं पाहिजे हा आपला आग्रह असतो. त्या आग्रहामुळे आणि ओझ्यामुळे पुढचा मनस्ताप आपल्यालाच झेलावा लागतो. म्हणून अपेक्षा असणं स्वाभाविक आहे पण ती पूर्ण झाली तरच आनंद आहे हे अस्वाभाविक आहे. ह्या "तरच" मधला "च" मनाला समाधान लाभू न देण्यासाठी कारणीभूत ठरतो. ती पूर्ण झाली तर आनंद आहेच पण नाही झाली तर अगदीच काही बिघडणार नाही. कारण छोटी असो वा मोठी शेवटी ती अपेक्षा आहे. दुसऱ्यांकडून असणारी. तिला छोटेपण आणि मोठेपण आपणच दिलेलं असतं. तिच्याही नकळत. म्हणून त्यांना पूर्ण "च" होण्याचा अधिकार जन्मापासून मिळालेला नाहीये. आणि तो मिळावा म्हणून आपणही प्रयत्न करू नये. कारण जन्मतः असणाऱ्या गोष्टी आयुष्यभर साथ देतात. त्यात बाहेरून बदल केला तर विद्रूपपणा येतो. म्हणून त्या अपेक्षेसोबतही न झटलेलंच बरं.
                         मराठी, हिंदी चित्रपटांमध्ये आजकाल ह्या अपेक्षांना धरून घराघरांमधे होणारे भांडणे, त्यांच्या अवाजवी किंवा त्यांच्या दृष्टीने असणाऱ्या अगदी साध्या अपेक्षा असे विषय खूप बहखूबीने हाताळलेले आपण पाहतो. बऱ्याच वेळा बऱ्याच अंशी वेगवेगळ्या पद्धतीने त्यांची उत्तरे देण्याचा प्रामाणिक प्रयत्नही त्यांनी केलाय. पण आपण त्यांनी केलेले प्रयत्न तेवढी वेळ सोडली तर त्यांच्या जवळच ठेवून परत येतो. इंग्रजीमधे दोन शब्दात ह्याच छान वर्णन केलय. ते म्हणजे "Expectations Hurts." आणि ते खरंच आहे. म्हणून That must be done or say मधल्या Must ची जागा May or May not नेच घेतलेली बरी. आणि म्हणूनच इंग्रजीमधल्या Must आणि मराठीमधल्या "च" (केलंच, बोललंच ई.) सोबत आपली दोस्ती न झालेलीच फायदेशीर आहे.
                           अध्यात्मामधली "साक्षीभावाची" संकल्पना एकदा वाचनात आली होती आणि ती ह्या सगळ्याला उत्तर असू शकते असं वाटत. त्या संकल्पनेनुसार "चांगलं झालं तरी मी उतावळेपणाने त्याच स्वागत करणार नाही किंवा मनासारखं झालं नाही तरी मी राग राग नाही करणार. ह्या दोन्ही वेळेस मी शांतपणे परिस्थितीला सामोरे जाईल. चांगलं झालंच तर मला आनंद नक्कीच होईल पण तो केवळ त्याच गोष्टींवर अवलंबून राहणार नाही. मी माझ्या Stable State ला लवकरात लवकर येण्याचा प्रयत्न करेल. दुःख झालं किंवा मनासारखं नाही झालं तर त्याचा स्पर्श माझ्या मनाला नक्कीच होईल पण त्याचा परिणाम मी माझ्या मनावर होऊ देणार नाही. हा भाव जपणं म्हणजे साक्षीभाव." तो  येण्यासाठी Practice करावी लागेल. पण येईल अशी अपेक्षा स्वतःकडून ठेवायलाच हवी. हो इथे "च" आवश्यकच आहे कारण ती अपेक्षा स्वतःकडून आहे.
                          आज अचानक लिहावंसं वाटलं म्हणून लिहायला बसलो. साहजिकच माझीही माझ्याकडून अपेक्षा होती ह्या "अपेक्षेवर" लिहावं अशी. ती चांगल्या पद्धतीने पूर्ण पडली की नाही ह्याची माहिती नाही किंबहुना त्याची गरजही नाही. पण पूर्ण करण्याचा प्रयत्न मी माझ्याच कडून मात्र प्रामाणिकपणे केलाय ह्याच समाधान नक्कीच आहे.
अगदी माझ्याच वरच्या अपेक्षेप्रमाणे..



                               - मकरंद











































शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

Advice.. सलाह.. सल्ला..!!

          4 वर्षांपूर्वी एका मार्केटिंग कंपनीच्या Seminar ला गेलो होतो. तेव्हा Stage वर एका तरुण मुलाची झोकात Entry झाली आणि त्याने सगळ्यांना एक प्रश्न विचारला.. "भारतात कोणती गोष्ट Free Of  Cost भेटते..?" सगळे विचारांत होते आणि Audience मधून एक जोरात आवाज आला.
Advice.. सलाह.. सल्ला..!!
          त्याच्या ह्या प्रश्नावर त्या वेळी मी जास्त विचार केला नव्हता. किंवा तसे अनुभव आले नव्हते. आले असतीलही पण ते कळाले नव्हते. आज असाच एक लेख वाचला आणि चार वर्षांपूर्वीची ती घटना आणि ह्या चार वर्षांमधले या बाबतीतले अनेक अनुभव झर्रर्रकन डोळ्यासमोरून गेले. त्याने विचारलेल्या प्रश्नामध्ये आणि दिलेल्या उत्तरामध्ये  खरंच तथ्य होतं. अख्या भारताचा विचार सोडाच पण वैयक्तिक जीवनात आपल्याला पावलोपावली असे सल्ले मिळतात. पूर्वीच्या काळी लोकांच्या अनुभवातून ते एकमेकांना सल्ले देत असतं. त्यामुळे कदाचित त्यांचं पालन होत असावं. आजच्या ह्या Social Media च्या काळात अनेक सल्ले हे ''केवळ ऐकण्यातून,वाचण्यातून" दिलेले असतात. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर साशंकतेची तलवार टांगते.
असो..
        एखादी गोष्ट मागणं आणि देणं यातं मागणंच खूप अवघड आहे. मागताना मनात कमीपणाचा भाव असतो. देताना मात्र मनाचा मोठेपणा लागतो. सल्ल्याचा बाबतीत हे तितकंसं खरं ठरत नाही. तो मागताना "गरज" असते, देताना मात्र "कौशल्य" अंगी असाव लागत. बहुतांश वेळी आपण आपल्या अनुभवातून, आपण गेलेल्या परिस्थितीतून सल्ला देतो. पण ज्याला गरज असते त्याची परिस्थिती, त्याला येणारा अनुभव हा आपल्यापेक्षा नक्कीच वेगळा असू शकतो. म्हणून त्याला समजून घेण्यासाठी लागणारा "संयम" आणि त्यानंतर विचाराअंती दिला जाणारा "सल्ला" हा कौशल्यानेच दिला जाऊ शकतो.
               शौनक अनेक दिवसांपासून  वेगळ्याच विचारात, संभ्रमित अवस्थेत होता. त्याला त्याच्या मनात चालणारे वेगवेगळे खेळ कोणालातरी सांगायचे होते. ज्यांना सांगण्याचा प्रयत्न त्याने केला त्यांनी त्याला लगेच त्यावर उत्तर देऊन त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे ते खेळ काही थांबले नाहीत. एके दिवशी तो त्याच्या काकांकडे गेला. काका फार "विवेकी" स्वभावाचे होते. त्यांनी त्याची सगळी कैफियत ऐकून घेतली आणि काहीच बोलले नाहीत. त्यानेही मी काय करू असा प्रश्न विचारला नाही. तो काकांजवळ मन मोकळा झाला. काही वेळानंतर तो निघून गेला. हसत हसत.. मोकळ्या मनाने..
               शौनक मोकळा होण्यासाठीच आला होता. त्याला सल्ला नकोच होता. पण आजपर्यंत तो त्याला मिळत गेला. त्याला मनातलं ऐकून घेणारं कोणीतरी पाहिजे होतं. ते त्याला काकांच्या रूपाने मिळालं.
               साहिलचा स्वभाव मात्र काकांच्या विरुद्ध होता. तो सदानकदा ज्याला त्याला त्याने काय करावं, कसं करावं सांगत असे. पहिल्यांदा आप्तेष्टांनी, मित्रांनी, लोकांनी त्याला ऐकून घेतलं. पण नंतर  मात्र तो त्यांना नकोसा वाटत होता. फक्त नको तेव्हा सल्ला दिल्याने.. काका त्यांच्या ऐकून घेण्याच्या स्वभावामुळे लोकांच्या मनात स्वतःच्या नकळत घर करून बसले. साहिल मात्र त्यांच्या मनातून दूर जातच राहिला. कायमच.. फक्त नको असलेला सल्ला दिल्याने..
               वपु म्हणायचे हवा असलेला माणूस त्यावेळी न मिळणं म्हणजे नरक. मला वाटतं "कोणी काय करावं हे त्याने विचारल्याशिवाय सांगणं हा ही नरकच.." म्हणून सल्ला देतानाही कौशल्य लागतं. सल्ला मागणारा संभ्रमित अवस्थेत असतो. आपण आपल्या अनुभवाचे अर्धवट तपशील आठवतील तसे सांगून त्याच्या या अवस्थेत अजूनच संभ्रम निर्माण करत असतो. त्याची पार्श्वभूमी, त्याची जडणघडण झालेली स्थिती, त्याची वैचारिक क्षमता या सगळ्याचा आपण विचारही करत नाही आणि सल्ला देऊन टाकतो. एखाद्याला दिलेल्या सल्ल्याचे त्याच्यावर काय परिणाम होतील ह्याची आपल्याला काहीच चिंता नसते. तो दिलेला सल्ला Successful झाला तर Credit मिळवण्याची घाई असते. " बघ, म्हणलं होत ना, असं केल्यावर होऊन जाईल म्हणून" असे वाक्य आपसूकच निघून जातात. हेच ते Credit असतं. पण Failure आलं तर ,"अरे असं नव्हतंच करायचं, हे थोडस चुकलंच तुझं" म्हणून आपण पळवाट शोधतोच. हे प्रत्येकासोबत घडतं. कदाचित आपणही अश्यांमधलेच एक असू. म्हणून सल्ला न देणं कधीही चांगलेच.
              पण....
एवढ्या वर्षांची आपल्या समाजाला लागलेली ही सवय अशी लगेच जाणं शक्यच नाही. म्हणून सल्ला द्यायचाच तर तो कृष्णासारखा द्यावा. अर्जुनासमोर सगळे गुरु आणि त्याचे बंधू युद्धासाठी थांबलेले असताना, संभ्रमित झालेल्या अर्जुनाला "उठ आणि युद्ध कर" असा आज्ञावाचक, ठाम, निश्चयी सल्ला कृष्णाने दिला होता. "उठलास तर बरं होईल आणि जमल्यास युद्धही करता येईल, हा सुद्धा पर्याय आहे असं मला वाटतं" असा सल्ला त्याने अर्जुनाला दिला असता तर गीतेतून मिळणारी शिकवण आपल्याला कधीच मिळाली नसती. त्या ठाम, निश्चयी सल्ल्याने अर्जुनाला धीर आला, तो युद्ध नुसताच लढला नाही तर जिंकलाही. कारण कृष्ण त्याच्या पाठीशी आहे हे त्याला माहिती होते. ही त्या सल्ला देणाऱ्याची भूमिका असावी.
आपल्यासारखी नक्कीच नव्हे..
              जेव्हा जेव्हा माणसाच्या हातात नेतृत्व येतं तेव्हा तो सगळं आपल्याच पद्धतीने करण्याचा विचार करतो. म्हणून "नेतृत्व आलं की सल्ला देणं ही आपसुकचं येतं." आणि आपल्या सोबतच्या, आपल्यापेक्षा कनिष्ठांनी सांगितलेली गोष्ट आपल्याला पटेनाशी होते. उलट त्यांनी कसे करायला हवे हा सल्ला आपल्याकडे तयारच असतो.
             नोकरी, आजच्या Corporate Industry मधे, IT Industry मधे आलेले असे अनेक अनुभव आपल्या दिमतीला आहेतच.  पण आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने, पदाने लहान असलेल्याचा सल्ला हा त्याच्या अनुभवानुसार, क्षमतेनुसार कधी कधी आपल्यालाही लागू होतो. रावणाचं वर्चस्व बघून एकवेळ रामही हतबल झाला होता आणि तेव्हा इंद्राने दिलेला सारथी मातली याने "प्रभू, रावणाचा अंत जवळ आला आहे, तुम्ही गोंधळून का जाता, तुमच्याकडे असणाऱ्या पितामहास्त्राचा वापर कधी करणार" असा योग्य शब्दांत  अचूक सल्ला दिला होता. म्हणून सल्लागार हा मातलीसारखा असावा. त्याने सल्ला घेणाऱ्याचा आत्मविश्वास वाढावा. शल्यासारख्या कर्णाला त्याचे दोष दाखवून संभ्रमित अवस्थेत टाकणारा नक्कीच नसावा.
            शौनकला असं बोलण्यासाठी "संयमी" काका भेटले. अर्जुनाला "धीर देणारा" कृष्ण भेटला. रामाला "आठवण करून देणारा" मातलीसारखा  सारथी  भेटला आणि मला माझेच "डायरी आणि पेन" हे जुने सोबती पुनःश्च भेटले. म्हणून आज हे मनातलं बोलावसं वाटलं आणि म्हणूनच हा सगळा खटाटोप..
त्यांच्या साथीने.. त्यांच्यासोबत.. सल्ला नक्कीच नव्हे...


                                          - मकरंद


                                                                                           ©makarand92.blogspot.com




























सोमवार, २९ फेब्रुवारी, २०१६

भावबंध..

              विचारातील भावनांना आज बऱ्याच दिवसांनी शब्दात उतरवावस वाटलं. त्या 'नंतर लिहू' ला सुद्धा हातातील पेनाने त्याच्या पूर्ण शक्तीने बाजूला सारलं. कदाचित हे दूर सारणं कायमचच असाव असं त्या पेनालाही वाटल असाव. असो..
              कॅमेऱ्यामधे बंदिस्त केलेले एकेकाळचे Photos आपल्याला नंतर कधीकाळी पाहताना त्या गेलेल्या काळाशी, त्या प्रसंगांशी, त्या आठवणींशी किती समरस करून टाकतात. ते समरस होणं विचारांना कितीतरी पटींनी चालना देतं. त्या विचारांत, त्या काळात स्वतःला हरवून टाकतं, गुंतवून टाकतं. हे सगळं घडत एकटं असताना. सोबतीला कोणी असतं तेव्हा संवादही आपसूकच असतो आणि जेव्हा संवाद असतो तेव्हा विचारांच अस्तित्व फार काळ टिकत नाही. विचारातून संवाद नक्कीच येऊ शकतो. परंतू संवाद चालू असताना विचारांना स्वतंत्रतेची मुभा नसते. ते क्षणिकच ठरतात, आणि पुन्हा त्याच गहनतेने तो येईलच याची शाश्वतीही नसते. म्हणून त्यांना एकटेपणा आवडतो. त्यांच्या स्वतंत्रेसाठी, जगण्यासाठी आणि कदाचित त्यांच्याच स्वार्थासाठीही..
            सहज दिदिच्या लग्नाचे Photos बघत बसलो होतो. बघता बघता दोन वर्ष निघून गेली. आज ते Photos पाहताना वेगळ्याच दृष्टीकोणातून वाटून गेलं, ''किती ही माणसं..? नातेवाईक, मित्र-मैत्रिणी, आपल्या आयुष्यात आपणहून जोडलेली, कधी नकळत जोडलेली पण आपलीशी झालेली, अन् कधी नात्यांचा भाव असणारी, त्याला प्रेमाने जपणारी, पण त्या नात्यातील भावाला नाव नसलेली ही माणसंच माणसं..''
           ५०-६० वर्षांच्या त्यांच्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात ''त्या दोघांनी'' जोडलेली ही माणसं पाहिली आणि वाटून गेलं, खरचं आपल्याला जोडता येतील का त्यांच्यासारखी एवढी माणसं..? जोडली तरी त्यांच्यासारखीच टिकवता येतील का ही माणसं..? अनुवांशिकतेमधून मिळालेल्या अनेक गुणांमधे हा ही गुण मला भरघोस मिळालेला असावा, अन् तोही दोघांकडून.. मला असं न राहवून वाटून गेलं.
''ती दोघं'' म्हणजे आई-बाबा.. आणि त्यांनी जोडलेली ही अगणित, प्रेमळ माणसं..

          आयुष्यात नाव, पैसा, गाडी, बंगला ह्या गोष्टी जितक्या आवश्यक वाटतात त्याहीपेक्षा आपण जोडणारी, जोडलेली माणसं महत्वाची असतात. त्यांच्या मागे धावता धावता माणसांच्या मागेही जाणूनबुजून धावायचं असतं ह्याचा विसर आपल्याही नकळत आपल्याला पडून जातो. पैसा हातातून निसटला तर मिळवता तरी येतो. माणूस निसटतो तो कायमचाच.. 
           आयुष्य म्हणजे एका बाजूला उंचच उंच डोंगर आणि दुसऱ्या बाजूला असणाऱ्या खोल दरीच्या मधला निमुळता, वळणावळणाचा रस्ता. त्या रस्त्यावर हातात हात धरून चालणारी आपण माणसं. जेव्हा एखाद्याचा हात सुटतो तेव्हा त्याला स्वतःहून सांभाळायचं असतं. ते फक्त आपल्याच हातात असतं. आपण हात सोडला तर कदाचित तो दरीत कोसळू शकतो. कायमचाच. पण त्याचा दुसरा हातही कोणाच्यातरी हातात असतोच. आणि त्याचा आधार त्याला वाचवतो. आपल्याला वाटत त्याने स्वताहून आपला हात पकडावा, त्याला वाटत आपण नुसता हात पुढे तरी करावा.. पण ह्यातलं काहीच होत नाही. तो शरीराने अजूनही आपल्या समोरच असतो. कदाचित त्याचा हातही आपल्याच हातात असतो. पण मनाने तो आपल्यापासून कायमचा दूर जातो. कधीच जवळ न येण्यासाठी. केवळ मदतीचा हात पुढे न केल्याने. पहिलं पाऊल आपणहून न उचलल्याने..
          असे प्रसंग प्रत्येकासोबत कमी-अधिक प्रमाणात घडतात. त्यांना आपणही विसरू शकत नाही. पण भविष्यात होणाऱ्या अशा प्रसंगांना रोखण्याची ताकद नियतीने आपल्याच हातांना दिलीये. म्हणून त्यांना त्यांच्या ताकदीनिशी वापरणं हेच आपलं काम..
          नियतीने बोलाविल्याशिवाय माणूस जेव्हा आपल्या हातातून निसटतो तेव्हा त्याचा शल्य आयुष्यभर बोचत राहत. आपल्या सभोवताली असणाऱ्या माणसांचं परिघ जेव्हा छोटं असतं तेव्हा त्याचा जास्त त्रास होतो. कारण निसटलेल्या माणसांची त्रिज्या आपल्या केंद्रबिंदूपासून खूपच कमी असते. म्हणून परिघही मोठ्ठं असावं. कारण चुकून एखादा निसटलाच तरी आधार देणारे खूप असतात आणि त्या पोकळीची तीव्रताही तेवढी नसते जेवढी ती छोट्या परिघात असते.
       
         माणसाला माणूस प्रत्येक ठिकाणी लागतो. आनंदात तो साजरा करण्यासाठी, दुःखात आधारासाठी, मनातलं सगळं बोलण्यासाठी, एकमेकांसोबत जगण्यासाठी, कधी हसण्यासाठी तर कधी रडण्यासाठी.. तो लागतोच. आणि तरीही आपण त्याच्या मागे धावण्याच्या ऐवजी भौतिक सुखाच्या मागे धावतो. पैश्याच्या मागे धावतो. सगळा दम हा दाम कमविण्यातच संपवतो. कितीही धन असेल तरीही मन शांत करायला माणूसच लागतो. माणसं नसतील तर माणूसच रिता होतो. निर्जीव वस्तूंमधे आपण कितीही झाले तरी रिते मन रमवूच शकत नाही. त्याला रमविण्यासाठी सजीवताच हवी. त्यातल्या त्यात हलणारी, बोलणारी, हसवणारी, त्याला फुलवणारी..
        म्हणून आजच्या काळाची गरज झालीये आपल्याच आयुष्यातील माणसांच्या संवर्धनाची. नव्या माणसांना जोडण्याची. त्यांना कलात्मकतेने टिकविण्याची आणि आपला परिघ आपणहून वाढविण्याची..
अनुवांशिकतेने 'माणसं जोडण्याचं' बीज प्रत्येकातच असतं. आज फक्त गरज आहे त्या बीजाला वटवृक्ष करण्याची..  

             - मकरंद  

                              ©makarand92.blogspot.com

गुरुवार, २९ ऑक्टोबर, २०१५

मृत्यू..


                 भीतीदायक शब्द आहे का हा..? कदाचित अनेकांसाठी असावा. मधल्या काळात अचानक एक अनपेक्षित घटना घडली. सुदिनी.. मनाला हादरवून टाकणारी.. आणि त्याच दिवशी एक विचार मनात छोट्याश्या विषयाचं छोटस बीज पेरून गेला. त्याला हवं तसं खतपाणी अजूनतरी माझ्याकडून मिळालं नाही. पण मला त्या छोट्याश्या बीजाला मरू द्यायचं नव्हतं  म्हणूनच आज प्रयत्न करतोय त्याच्याविषयी लिहिण्याचा.. त्याला वाचविण्याचा.. त्यात नवा जीव ओतण्याचा.. अन् त्या मृत्युच्या बीजालाही जगायला भाग पाडण्याचा..
                   एवढा का घाबरत असेल माणूस ह्या 'मृत्यू' ला..? या जगात येताना आनंदाच्या सरींनी अनेकांना भिजविणारे आपण जाताना मात्र त्यांना दुःखाच्या खाईत ढकलून जातो. किती अजब आहे हे. आज आपल्यासोबत असणारा माणूस उद्या आपल्यासोबत नसेल ही कल्पनाच किती भयानक आहे आणि म्हणूनच स्वतःपेक्षाही दुसऱ्यामधेच  Involve होण्याची सवय असणारा हा माणूस त्याच्या कायमच्या जाण्याने इतका सैरभैर होत असेल. मला वाटायचं Attachment आणि Involvement ह्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असाव्यात. पण त्या कधीच नसतात. माणूस Attach प्रत्येकाशी होऊ शकतो पण Involvement मात्र क्वचितच घडत जाते. एखाद्यासोबतची Involvement जितका आनंद, आधार, समाधान माणसाला देत असते तितकच जास्त दुःखी, निराधार त्या व्यक्तीच्या जाण्याने ती माणसाला बनवते. जसे जसे वर्ष सरत जातात तशी तशी ह्या क्वचित घडणाऱ्या घटनांची संख्या कळत-नकळत वाढत जाते. आणि एक क्षण येतो.. परीक्षेचा.. ज्यावेळी वाटत, एवढं सगळं सोडून निघून जायचं..? काहीही न घेता..? कायमचच..?
                 आणि इथेच कदाचित माणूस अडकत असावा. एका श्वासाने सुरु झालेली आपल्या आयुष्याची गाडी, इतके टक्के टोणपे खाल्ले तरी कधी बंद न पडलेली ती, आता मात्र केवळ एका उच्छवासानंतर कायमची बंद पडणार हे नियतीच गणितच बहुतांश जणांना सुटत नसावं. म्हणूनच अशा प्रश्नांची समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने तो ह्या मृत्यूला घाबरत असावा.
                  लहानपणी आपल्याला सांभाळणारे इतके असायचे की 'मृत्यू' नावाच्या शब्दाची सावली सुद्धा आपल्यावर पडत नसायची. तरुणपणी मात्र तोच मृत्यू आपल्या कृतींकडे बघून कधीकधी हसत असावा. 'जगणं काय असतं' हे तो आपल्याला ओरडून सांगत असतो पण त्याने मिठी मारल्यावरच बहुतांश वेळी ते आपल्याला का कळतं असावं ह्याच उत्तर ज्याच तोच देऊ शकतो. आपल्या या ज्ञानातील अज्ञानावरच तो मंद हास्य करत असेल. तर कधी अगदी ह्याच्या उलट परिस्थिती सुद्धा पहावयास मिळते. जगायला दिलेलं हे आयुष्य चांगल्या गोष्टींमधे खर्च केल तर त्यालाही आनंद होत असेल. मग तोही कदाचित आपल्याकडे चार जणांच्या भेटी घेऊन येईल..
असो..
                    कधी तो नुसती टिचकी मारून जातो तर कधी दरदरून घाम फुटावा इतकी भीती दाखवून जातो. कधी इतका त्रास देतो की माणसाला त्याच्या मिठीत एकदाचं कायमचं जावसं वाटावं पण तो धड घट्ट मिठीतही घेत नाही, तर कधी शांत झोपलेल्या माणसाला त्याच्याही नकळत अलगद घेऊन जातो. जणू त्याची पहाट त्याला दुसरीकडेच करायची असते. काहीही न कळवता होणारी त्याची भेटच त्याला भीतीदायक बनवत असावी. म्हणून खरंच त्याला एवढं घाबरायचं..? नाही.. तो नुसता घाबरविण्यासाठी नक्कीच आलेला नसावा. त्याचाही काहीतरी हेतू असेलचं.. कधी टिचकी मारताना तर कधी घाम फुटेपर्यंत पळता भुई थोडी करणारा त्याचा क्षणभंगुर सहवास आपल्याला त्याच्या हेतूची आठवण तर करून देत नसेल ना.. ?

                 गावाला निघालेल्या आपल्याला गाडीत बसल्यावरच एखाद्या वस्तूची आठवण होते. पण त्या मृत्युसोबत त्याच्या गावी जाताना अशा राहिलेल्या गोष्टींच्या आठवणींनीच आपला उर भरून आला तर..? त्याने मारलेल्या टिचक्या कदाचित ह्या अशा उर भरून आणणाऱ्या गोष्टींची यादी कमी करण्यासाठीच असाव्यात. आपल्यातील स्वार्थी माणसाला निस्वार्थ भावनेने जगण्याची दिलेली ती संधी तर नसेल..? कारण फक्त त्या निस्वार्थ भावनेनेच ती यादी कमी होऊ शकते. निदान त्याच्यासोबत जाताना आपल्याच जीवनाकडे एक कटाक्ष टाकला तर आपल्याला वाटलं पाहिजे,
" व्वा..!! मजा आ गया.." त्या वाक्यामधलं समाधानच आपल्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवेल.
                मनात राहिलेल्या 'स्वावलंबी इच्छा', एखाद्या व्यक्ती बद्दल असणाऱ्या भावना, मतभेद, वर्षानुवर्षे मनातच कुढत राहिलेलं सत्य इत्यादी गोष्टी तो आलेला असतानाच समोर येतात. माणूस हा एकमेव असा प्राणी आहे की त्याला व्यक्त होण्यासाठी निसर्गाने अनेक मार्गांची सोय करून ठेवली आहे. मग ह्या व्यक्ततेची जाणीव इतक्या उशीराचं का..? पोटी असलेलं ओठी यायला सुद्धा धैर्य लागतं. म्हणूनच अप्रत्यक्षरीत्या सांगितल्या जाणाऱ्या भावनांना कधी प्रत्यक्षाच्या वाटेवरून चालवायचं असतं अन्यथा त्या शेवटच्या क्षणी 'अरे हे करायचच राहिलं' अशी अवस्था येउन ठेपते. त्या क्षणी आपल्या हातात वेळही नसते आणि काळ तर प्रत्यक्ष समोरच उभा असतो. म्हणून जीवन जगताना मनातल्या भावनांना वेळोवेळी वाट करून दिलेली बरी.. न जाणो ती संधी तो दुसऱ्यांदा देईलच की नाही..?
                संत कबीरांनी म्हणून ठेवलय, '' कल करे सो आज कर, आज करे सो अभी. " कदाचित हे मृत्युबद्दलच असावं. आपण बोलण्या-बोलण्यातून किती सहजगत्या म्हणून जातो ' उद्या बघू.' पण त्या शेवटच्या क्षणी वर्तमान आणि भूतकाळाच्या खांद्यांवर आधार घेत जेव्हा आपली नजर भविष्याकडे जाते तेव्हा डोळ्यासमोर फक्त अंधार असतो. कारण  मृत्यूनंतर उद्या नसतोच. तोच शेवट.. चालू वर्तमानाचा, गेलेल्या भूतकाळाचा आणि कधीच न दिसणाऱ्या त्या आपल्याच भविष्याचा..
               हा न दिसणारा उद्याचा दिवसच माणसाला सर्वात जास्त भयकंपित करत असावा. कबीरांच हे सार्वत्रिक वापरलं जाणार वाक्य आज खूप वेगळा दृष्टीकोन देऊन जातंय. त्या एकाच वाक्यामध्ये अनेक प्रश्नांची खात्रीलायक उत्तरे जराश्या वेगळ्या दृष्टीकोनातून पाहिल्यास अनेकांना सापडतील. एकंदरीत काय तर 'तो' येणार आहे हे नक्कीच. आपण हसत, मनमोकळं रहायचं ही त्याची अपेक्षा. त्याच्या सोबत जाताना आयुष्याच्या बाबतीत खंत कोणालाही नसावी. उलट आपणंच अभिमानाने म्हणावं...

                     " ऐ मौत, तू भी आजा एक दिन हमारे बुलाने पे.. 
                         तू रोएगी बहोत उस दिन और हम हसते हसते मर जाएंगे…!! " 


                        - मकरंद 






















बुधवार, ८ जुलै, २०१५

खिचॅक..


          काहीतरी वेगळचं नाव दिसतंय ना..? मलाही असचं वाटल होत. शेक्सपिअर म्हणालाच होता ''नावात काय असत..?" पण ह्या वाक्याखाली स्वतःच नाव लिहिण्यास मात्र तो विसरला नाही. म्हणजेच नावात नक्कीच काहीतरी असणार.. जश्या त्याच्या तश्याच ह्या Article च्या..
        पावसाळा सुरु होऊन महिना होत आला. हवा तेवढा पाऊस जरी झाला नसला तरी निसर्गाला हिरव्यागार सानिध्यामधे खुलविण्यासाठी तो हवा तेवढा नक्कीच बरसला आहे. माझ्यासारख्या निसर्गप्रेमींना आजपर्यंत त्याची एक सर घराबाहेर काढण्यासाठी नक्कीच पुरेशी ठरलीये. म्हणूनच की काय गेल्या दोन आठवड्यांमधे याच निसर्गाने अनेकांसहित मलाही स्वतःत सामावून घेतलं.
        एका बाजूला उंचच उंच खडकाळ डोंगर, त्याचे हत्तीच्या सुळ्यासारखे बाहेर आलेले दगड, त्याच विशाल डोंगराच छत असणारा छोटा रस्ता, त्या रस्त्यावरून धावणाऱ्या गाड्या आणि बाजूला असणारी हिरवीगार खोल दरी...  असं दृश्य मी लहानपणापासून Computer च्या  Desktop वर असणाऱ्या Wallpapers मधेच पाहिलेलं.. आणि प्रत्यक्षात असे दृश्य पाहायला आपल्याला Foreign Countries मधेच जाव लागणार असा असलेला निव्वळ भ्रम त्या 'माळशेज' घाटाच्या भेटीने साफ चुकीचा ठरवला. घाटामध्ये कोसळलेल्या दरडीमुळे बंद झालेला रस्ता पूर्ववत करण्याचा आटोकाट प्रयत्न अनेक माणसे क्रेन, ट्रक यांच्या सहाय्याने करत होते. धुवांधार कोसळणाऱ्या पावसाची, स्वतःच्या जीवाची तमा न बाळगता.. आणि आपण..  आपण किती सहजतेने कुठल्याही सरकारवर टिका करून मोकळे होतो. म्हणूनच की काय बोलून दाखवण्यापेक्षा कृतीतून उत्तर देण्याचा प्रयत्न हे सरकार करत असावं असं काहीसं वेगळच मला त्या क्षणभरात वाटून गेलं.
असो..
          कमळगडावरचाही अनुभव असाच काहीसा होता. "शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप" या उक्तीची प्रत्येक पावलागणिक 'तो' गड जाणीव करून देत होता. Practically महाराजांची विचार करण्याची पद्धत, त्यांच्या व्यूहरचना, डावपेच किती सक्षम असायचे हे त्यांच्या कुठल्याही गडाला दिलेल्या भेटीत तात्काळ दिसून येत. ४००० फूट उंचीवर असणाऱ्या त्या बालेकिल्ल्यावरील ३०० फूट खोलीच्या कावेच्या विहिरीत उतरल्यावर तर आश्चर्याला सीमाच नव्हती. कुतूहलापोटी चाखलेली त्या कावेची चव तोंडात बोट घालायला लावणारी होती आणि म्हणूनच आयुष्यात पहिल्यांदाच रात्रीतून चढून सर केलेला तो गड 'कमळासारखाच' सगळ्याहून वेगळा ठरला.
         या सगळ्या गोष्टीचा आणि शीर्षकाचा अजूनतरी काहीच संबंध नाही. पण ह्या सगळ्या गोष्टींमध्ये सतत सोबत असणारा, त्यांना अविस्मरणीय बनवणारा, अनेक आठवणींना पुनरुजीवीत करणारा 'तो' म्हणजे सगळ्यांचाच लाडका ''कॅमेरा" आणि त्याचाच तो आवाज.. खिचॅक.. 
         गेल्या १० वर्षाच्या काळात या कॅमेऱ्याने एखाद्या गोष्टीमध्ये Development ला किती वाव असू शकतो हे दाखवून दिलय. आणि म्हणूनच त्याच्यामधील प्रत्येक Development ने आपल्यालाही Wow म्हणायला भाग पाडलय. माणसाच्या आयुष्यात घडणारे प्रत्येक क्षण त्याच्या स्मृतीत राहतातच असे नाही. काळानुरूप विस्मृतीच्या पावलावर पाऊल ठेवून ते कधी निघून जातात ते आपल्यालाही कळत नाही. विस्मृती ही निसर्गाने माणसाला दिलेली एक देणगीच नव्हे का..? ती नसती तर आठवणींमधे रमणारा माणूस आज पाहायलाच मिळाला नसता. आणि आठवणीच नसत्या तर त्यांना साठवून ठेवणारा हा कॅमेरा…… .
   
        माझ्या जन्माच्या पहिल्या दिवशी मी कसा होतो हे मला जितक्या सहजतेने तो दाखवू शकत नसायचा तितक्याच सहजतेने आज जन्माला येणाऱ्या प्रत्येक बाळाला तो हवाहवासा वाटतो. जन्मापासूनच लागलेली त्याची सवय या भूमातेपासून दूर जातानाही सुटत नाही ही त्याची खासियतच म्हणायची. आपल्या आयुष्यातील असंख्य चांगल्या-वाईट क्षणांना त्याने स्वतःच्या विशाल अशा उदरात सामावून घेतलंय.. ह्याच चांगल्या क्षणातून आनंद, प्रेरणा देणारा हा कॅमेरा अन् त्याचे Photos मात्र वाईट घटनेमधुन आपल्या मधील सुधारणेला असलेला वाव आपल्याला दाखवून देतात. क्षणाक्षणाला त्याच्या फोटोत कैद होणारे आजचे आपण जेव्हा १०-२० वर्षानंतर स्वतःकडे एका वेगळ्याच नजरेने पाहु तेव्हा आपल्याच विस्मृतीत गेलेल्या आठवणींना क्षणार्धात उजाळा मिळाल्याशिवाय राहणार नाही हे नक्कीच..     
        Colleges मधील Birthdays, Lectures मधे सरांचे काढलेले Photos, Videos, एखाद्या Celebrity शी झालेली भेट, आई-वडिलांच्या लग्नाची Silver Jubilee, नुकतचं जन्मलेलं तान्हुलं बाळ, त्याच्या छोट्याश्या अन् क्षणिक अशा मनमोहक हालचाली, कधीकाळी Tension मधे असणारे आपण, एकांतात असताना स्वतःचे काढलेले वेडेवाकडे Photos, रात्री-अपरात्री मित्रांसोबत केलेला धिंगाणा, आपण पहिल्यांदाच बनविलेला एखादा पदार्थ, जुन्या मित्र-मैत्रिणींची झालेली भेट, लग्नसमारंभ, पार्टी, Famous होत जाणारे सगळ्या प्रकारचे Selfies, आपण केलेल्या निसर्गभेटी असे एक ना अनेक क्षण त्या Photos मधे साठवून ठेवण्याचा प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. या सगळ्या क्षणांना अमूर्त रूप देण्याचं काम हा कॅमेरा अगदी बेझिजकपणे, कोणतीही तक्रार न करता करतो आहे आणि तो सतत करतही राहिल ह्यात कुठलाही वादच नसावा...
     
          गेल्या दोन आठवड्यांमधे या सगळ्याचाच जरा जास्तच अनुभव मी घेतला.. त्या निसर्गासोबत अनुभवणारा प्रत्येक क्षण कसा माझ्या डोळ्यात आणि कॅमेऱ्यामधे साठवता येईल हे मी क्षणाक्षणाला बघत होतो. त्या निसर्गाच्या असणाऱ्या प्रत्येक फोटोत मीही असावं असा आग्रह ते Selfies Selfishly करतच होते. मग मीही त्यांना अडवलं नाही. पण एका क्षणाला तो कॅमेरा बंद पडला. किंबहुना त्याला निसर्गातील काही क्षणांना स्वतःत सामावून घेणं अशक्य होऊ लागलं. उन अन् पावसाची चालणारी शिवणापाणी, एका क्षणाला मनाला हवीहवीशी वाटणारी मंद झुळूक अन् दुसऱ्याच क्षणाला आपल्यालाही हतबल करणारा तिचाच तो बेभान वारा, समोरच्या धुक्यात जाणवणारा थंडावा या सगळ्या गोष्टींसमोर मात्र तो यंत्रवत कॅमेरा हतबल झालेला मला दिसला. मला वाटून गेल आत काय..?
            पण ह्या हतबल झालेल्या कॅमेऱ्याने दिलेल्या एका Signal ने माझ्या मनाच्या कॅमेऱ्याला Activate केलं. त्या मनाच्या कॅमेऱ्याने दृष्टीच्या सहाय्याने आपला Focus Adjust केला आणि त्या निसर्गाच्या या क्षणांना मनाच्या कप्प्यात सामावून घेणारा, त्या अनुभवांना मनात कायम साठवणारा, तो मनाच्या कॅमेऱ्याचा आवाज पुन्हा कानात घुमला..
तोच तो आवाज..
तुमच्या-आमच्या आवडीचा..

खिचॅक.. 


                         - मकरंद 







शनिवार, ११ एप्रिल, २०१५

व्यक्त-अव्यक्त


           लहानपणापासूनच तो असाच आहे. किंबहुना माझी आणि त्याची ओळख जेव्हा झाली तेव्हापासून तरी तो मला तसाच भासतो. वर्षभर त्याच्यासोबत राहिल्याने माझ्यामधील 'त्या' छोट्याश्या बीजाचं बरचं मोठ रोपट झालं. त्यामधे त्याची काहीच चूक नव्हती. बीजाला पोषक वातावरण मिळाल की त्याची वाढ होणारच ही निसर्गतः चालत आलेली गोष्ट आहे. मग ते बीज जमिनीत पेरलेलं असेल किंवा आपल्यामधेच अंगभूत असेल. पोषक वातावरणात ते वाढणारच. आणि 'तो' त्या वातावरणाचाच एक भाग होता..
             काहीच संदर्भ लागत नसेल. हो ना..? कोण तो, कुठलं रोपट आणि कसलं बीज..? 
'तो'- माझा जवळचा मित्र. त्याच्यासारखे अनेक जण पाहिले मी. समवयस्कही आणि मोठेही. समवयस्कांबाबतीच कोडं लवकर सुटायच. मोठ्यांच्या बाबतीतील कोडयाला अर्थपूर्ण दृष्टीची चावी अशातच मिळाली. म्हणून ते जरा उशीरा सुटायला लागलं. मीही ह्या सगळ्यांसारखाच होतो. हो...होतो. पण मला बदलण भाग आहे हे जेव्हा कळायला लागलं तेव्हा मी प्रयत्नपूर्वक बदलण्यासाठी सुरवात केली. हळूहळूच ती. कासवाच्या गतीने.. कासवासारखीच...
         नक्कीच संदर्भ अजूनही लागत नसणार..आणि ज्यांना लागलाय त्यांना या संदर्भाच स्पष्टीकरण अजुनच Interesting असणार.. नाही का..? असो.
      
         प्रत्येकाचा एक विशिष्ट स्वभाव असतो. त्या स्वभावाच्या अनेक पैलुंमधील एक पैलू म्हणजे ते बीज.. त्याचच हे रोपट आणि काही जणांमधे झालेला त्याचाच वटवृक्ष.. अशातच अनेकांच्या अस्पष्ट स्वभावामधे मला हा पैलू स्पष्टपणे दिसून आला. कदाचित तो माझ्यामधेही होता किंबहुना अंशतः अजूनही आहेच म्हणून इतका स्पष्टपणे दिसला असावा. 
        'व्यक्ती' हा शब्द फक्त माणसांनाच का लागु होत असावा हा प्रश्न मला पडला होता. आणि उत्तरासाठी एका क्षणाचीही उसंत न घेता "ज्याला व्यक्त होता येत ती व्यक्ती."  इतकं साधं, सरळ उत्तर त्या मनाने मला दिलं. मग बाकीचे प्राणी किंवा सजीव व्यक्त होत नाहीत का..?ह्या खोलात मीही गेलो नाही. कदाचित माझ्या विचारांच्या पार्श्वभुमीला अनुसरून असणारी ह्या व्यक्तीची व्याख़्या त्या मनाने तात्काळ माझ्यासमोर पेश केली. व्यक्त होता येणारी ती व्यक्ती..
         माझ्यासहीत अनेकांच्या स्वभावात दिसलेला तो पैलू म्हणजे 'व्यक्त होता न येणं.' इथे हा 'न' महत्वाचा.. जेव्हा एकाच विचाराचा भुंगा आपल्याभोवती सारखा भ्रमण करत असतो आणि आपण त्याला धड पकडुही शकत नाही ना लांबही करू शकत नाही तेव्हा कोणाचीतरी मदत घेऊन त्या भुंग्याला आपल्यापासून दूर सारणं आपल्यासाठी कधीही मानसिकदृष्ट्या चांगल ठरतं. कारण शारीरिक ताणापेक्षा मानसिक ताणच माणसाला जास्त थकवतो. अशावेळी जेव्हा आपल्याला एखाद्या गोष्टीचा विचार करायचा नसतो तेव्हा त्याच गोष्टीचा विचार आपण जास्त वेळ करतो.. मग ती परिस्थिती असेल, व्यक्ती असेल, भविष्य, वर्तमान, भूतकाळ असेल. ते काहीही असू शकत. त्याला सीमाच नाही. किती वेळ विचार करायचा ह्याची सीमा ज्याची त्याने ठरवायची असते. पण केवळ त्याच गोष्टीवर विचार केल्याने आणि मनात चाललेल्या प्रश्न-उत्तरांच्या खेळांना वाट न मिळाल्याने त्याचा परिणाम आपल्या रोजच्या जीवनावर होतो. हे तुमच्या-आमच्यापैकी प्रत्येकानेच कधी न कधी अनुभवलं असेलच. कारण त्या मनातील प्रश्नांचं समाधान आपण दिलेल्या उत्तराने काही काळच होत. त्यानंतर मात्र त्यांना योग्य उत्तराची आस असते आणि म्हणूनच ते डोकावतात. पुन्हा पुन्हा..
   
       विनयसोबत अस अनेकदा होत असे. त्याला एखादी मनातील गोष्ट जेव्हा समोरच्याला सांगावीशी वाटत असे तेव्हा तो सांगू शकत नसे. एकदा त्याच्याच अत्यंत जवळच्या आणि त्याच्यापेक्षा वयाने मोठ्या असणाऱ्या व्यक्तीला सांगायची असलेली गोष्ट तो बरेच दिवस, महिने, वर्ष सांगू शकत नव्हता. परंतु तीच गोष्ट त्याला रोज खात असे. त्यांना सांगितल्यानंतरच्या परिणामांच्या भितीने किंवा त्यांच्याप्रती असलेल्या आदरयुक्त भीतीपोटी तो या गोष्टीबाबत त्यांच्यासमोर खंबीरपणे उभा राहू शकला नसेल. परंतु एक दिवस मात्र त्याने पत्र लिहून त्यांना सगळ सांगून टाकलं आणि त्या क्षणापासून ते विचार अन् त्यांचा तो भुंगा त्याच्यापासून कायमचा दूर गेला. इतके दिवस ओझं वाटणारी गोष्ट जेव्हा त्याने पत्ररूपी का होईना व्यक्त केली तेव्हा त्याचच मन हलकं झालं अस तो म्हणाला आणि नंतर तिच गोष्ट सांगायला आपण उगीच इतका वेळ लावला, उगीच ते ओझं तसच घेऊन राहिलो अस त्याला वाटायला लागलं. इथे त्याला त्या पत्राची मदत झाली. कारण त्याला त्या रोजच्या गरगरणाऱ्या भुंग्यापासून मुक्तता हवी होती आणि त्यासाठीच व्यक्तता नितांत आवश्यक होती. ते पत्ररूपी माध्यम फक्त एक रस्ता होता. अनेकांमधला एक. त्या रस्त्यावरून चालत जाऊन समोरच्याजवळ व्यक्त होणं त्याच्यासाठी महाकठीण काम होत. म्हणूनच व्यक्त झाल्यानंतरचा आनंद त्याच्या मनाला हलकं करून गेला. चालत आलेला तो अवघड रस्ता आता मात्र त्याला सोपा वाटू लागला. म्हणूनच त्या रस्त्यावर चालणं महत्वाचं, समोरच्याजवळ व्यक्त होणं महत्वाचं.. कारण माध्यमांपेक्षा त्याच्यानंतरच्या परिणामाची गरज आपल्याला जास्त असते. हो ना..?
असो..
         मधुराचही असचं काहीसं होत. तिच्याबद्दल मला अनेक मित्र-मैत्रीण म्हणाले होते की ती फारच secretive आहे and all. मलाही पहिल्यांदा भारी वाटायचं. आपल्या मनातील गोष्टी ती कोणालाच कळू देत नाही ही खासियतच झाली तिची.. नाही का..? आणि एक दिवस अचानक वाटलं, "अरे, स्वतःच्या मनातील गोष्टी व्यक्त होण्यासारखा एकही माणूस हिच्या आयुष्यात नाही..? " जेव्हा हीच गोष्ट मी तिला बोलून दाखवली तेव्हा तिच्या Secretive पणाची तिलाच कीव आली आणि तिनेही स्वतःमधल्या एका नवीन बदलाला सुरुवात केली. आज ती आधीपेक्षाही आनंदी आहे अन् छोट्या छोट्या व्यक्ततेतून मुक्त होत आहे.

          असे अनेक प्रसंग, घटना, व्यक्ती आपण सगळेच रोज अनुभवतो. आपल्याजवळही अनेक जण त्यांच्या व्यक्तीगत जीवनातील गोष्टी व्यक्त करून मोकळे होतात. आपणही त्यांना योग्य सल्ला देऊन योग्य मार्गावर आणण्याचा प्रयत्न करत असतो. ज्या व्यक्तीजवळ अशा अनेक व्यक्ती व्यक्त होत असतात त्यालाच जेव्हा मनातील भावनांच्या खेळापासून व्यक्त होऊन मुक्त व्हायचं असत तेव्हा तो तेवढ्याच सहजासहजी होऊ शकत नाही हे ही तितकचं खरं. म्हणूनच त्याने त्या रस्त्यावर आपणहून चालायचं असतं, ते माध्यम आपणहून शोधायचं असत, ती आपल्या आजूबाजूलाच असतात. त्यांची कमी कधीच नसते. जसं गाणं गाणाऱ्यासाठी सूर पक्क असणं आवश्यक असत अन् ते नसल्यास कच्च्या सुरांना रियाझाने पक्क करता येत तसचं माणसाला आनंदी राहण्यासाठी मन शांत असणं आवश्यक असतं अन् ते नसल्यास हडबडलेल्या मनाला व्यक्ततेच्या आधाराने मुक्त, शांत करता येत..
            या सगळ्याचा सारांश सांगायचा झाला तर, " व्यक्ती म्हणून जगताना वेळोवेळी व्यक्त होणं भागचं असतं, तिथे माध्यमांचा वा परिस्थितीचा विचार करायचा नसतो ह्याची आज शाश्वती झाली." कदाचित हे लिहिलेलं अनेकांनी अनुभवलं असेल, अनेकांना ते नवीनही असेल. माझ्यासारख्याच अनेकांनी मनातील भावनांच्या खेळांना व्यक्त करण्याचे स्वतःचे मार्गही शोधून काढले असतील. कागद-पेनाच्या सहाय्याने व्यक्त होण्याच्या ह्या मार्गात सुसूत्रता, साचेबद्धपणा आहे की नाही हे मीही जाणत नाही. पण मला मार्ग सापडला..
व्यक्त होण्याचा..
तुमच काय..??



                    - मकरंद


                                            ©makarand92.blogspot.com

गुरुवार, १९ मार्च, २०१५

INTENTION




               दोन तीन दिवसांपासून मी विचारात होतो.. एका विषयाच्या.. INTENTION.. त्याच्यावर लिहिता येत का हा प्रयोग मलाच माझ्यावर करायचा होता. मला वाटत होत ह्या एका शब्दावर काय लिहिणार..? पण कधी वाटायच खूप लिहिता येण्यासारख आहे या एका शब्दावर.. Article लिहिल्यानंतर  शीर्षकाचा शोध घेणारा मी प्रथमच शीर्षकावरून Article चा शोध घेतोय. अनेक प्रसंग,संदर्भ, अनुभव दिमतीला असुनही मला सुरुवात कशी करायची हे कोड सुटत नाहीये. "लिहलं की लिहिल्या जात" हे माझच वाक्य मला आधार देतय. कळत पण वळत नाही अशी परिस्थिती अनेकदा येते पण आज ना धड कळेना व नीट वळेनाही..
मग हे लिहिण्यामागच INTENTION काय.. ?
मी अनुत्तरीतच.
               आपल्या ह्या रोजच्या आयुष्यात पावलोपावली स्वतःच्या अस्तित्वाची हे  INTENTION जाणीव करून देत असतं. त्याच्याकडे Intentionally बघितल्यावरच कदाचित आपल्याला हे कळू शकत. 'ते' चुकल तर आपल्यामध्ये 'महाभारत' घडविण्याची ताकद त्याची नक्कीच आहे. वपु म्हणायचेच की "महाभारत हे नात्यांमधेच घडतं'' कदाचित त्यांच्या ह्या वाक्याच्या मागचा संदर्भ INTENTION च असू शकेल. कारण बहुतांश वेळी माणसामाणसामधे घडणाऱ्या रामायण-महाभारतात महत्वाची भूमिका ही ह्या INTENTION चीच असते.
               समोरच्या व्यक्तीला आपल्या मनातील भावना योग्य शब्दांत पोहचवता येणं यासारख सुख नाही आणि भावना चांगली असूनही ती त्याच्यापर्यंत योग्य INTENTION ने न पोहचण यासारखी वाईट गोष्ट दुसरी कुठलीही नाही. कारण योग्य INTENTION ने पोहोचणारी भावना जेवढा आनंद आपल्याला देते त्याहूनही अधिक शल्य चुकीच्या INTENTION मुळे भेटतं. मग मनातील भावना कितीही पवित्र, शुद्ध, सरळ असेल तरीही तिला विरुद्धार्थी बनविण्याचं सामर्थ्य ह्याच्याकडे कुठून आल असणारे देवच जाणे..
परंतु दरवेळेस योग्यच INTENTION ने समोरच्या व्यक्तीपर्यंत आपल्या भावना पोहचण किंवा त्यानेही योग्यच INTENTION ने त्या घेणं, थोडक्यात इतकं Ideal राहणं म्हणजे ' विराट कोहली कडून प्रत्येक सामन्यात शतकाची अपेक्षा करण्यासारखंच झालं  नव्हे का..?' तो ही कधीतरी शून्यावर बाद होतोच. आणि आपल्यासारख्या सामान्यांसाठी तर अशा बाबतीत शून्यावर बाद होण्याचीच वेळ अनेकदा येत असते..
हो ना..?  असो..
              सभोवताली मी अशी अनेक उदाहरणे पाहिली आहेत की ज्यांची मैत्री, नातं, प्रेम केवळ योग्य भावना, योग्य वेळी, योग्य प्रकारे, योग्य शब्दात न पोहचल्याने बिघडलेली आहेत. कधी त्यात चूक ती भावना योग्य शब्दात, योग्य वेळेत पोहचविणाऱ्याची जशी असते तशीच कधी चूक ती भावना योग्य प्रकारे कळून घेता  न आल्याने समोरच्याचीही असते. म्हणूनच हे INTENTION जितक्या वेळेला नातं घडवतं तितक्याच वेळेला ते नातं बिघडवतही. मग ह्या घडण्या-बिघडण्याच्या प्रक्रियेमध्ये काहीतरी मार्ग असेलच अस मला बऱ्याचदा वाटून गेल. पण 'योग्य' शब्दाच्या मागे धावणाऱ्या मला तो योग्य मार्ग काही केल्या मिळत नव्हता . त्या घडण्याला बिघडण्यापासून रोखणारा.. आणि आज अचानक 'तो' गवसला.. अनाहूतपणे.. माझ्याही नकळत..
           
            चांगल नात घडविण्याच काम आपण जेव्हा चांगल्या INTENTION ने करत असतो तेव्हाच या नात्यामध्ये नुकत्याच जन्मलेल्या विश्वासाची वाढ होत असते. जेव्हा विश्वासाचही वय वाढू लागत तेव्हा त्याला आपल्यातील अहंकाराची सोबत मिळू लागते. नात्यामध्ये वावरताना आपलं चांगल INTENTION जितक महत्वाच असत तितकच किंबहुना त्याहूनही जास्त महत्वाच आपल्यातील अहंकारापासून त्या नात्याला योग्य वेळी वाचवण हे ही आपल्याच हातात असतं. Modern भाषेतील हा Ego Problem त्या नात्याच्या वयाच्या वाढीनुसार आपणही अनुभवतो. ही काळ्या दगडावरची रेघ पुसली तरी पुसल्या जाणार नाही इतकी सत्य आहे यात कोणाचही दुमत नसेल. किमान एकांतात मान्य करताना तरीही.. 
            एखाद्या गोष्टीकडे केवळ आपल्याच दृष्टीकोनातून पाहणारे आपण जेव्हा त्याच गोष्टीला समोरच्याच्या डोळ्यातून पाहतो तेव्हा कधी कधी आपल्यालाच आपल्या विचार करण्याच्या पद्धतीची शरम वाटायला लागते. पण तिथेही 'आपला ती गोष्ट पाहण्याचा दृष्टीकोन चुकला' हे मान्य करण्याची हिम्मत बहुतांश वेळी तो अहंकार आपल्याकडून हिरावून घेतो. हे ही तितकच खर..
             आयुष्य जगताना ह्या चुका प्रत्येकाकडून होतात. पण तरीही अशा अनेक चुकांमधून शिकूनही आपल्याकडून त्या चुका पुन्हा पुन्हा का घडतात ह्याच उत्तर माझ्या आजच्या वयाला शोधूनही सापडल नाही. परंतु प्रत्येक प्रश्नाच उत्तर मिळावच अस नाही ना..?  कारण उत्तर न मिळणे हे सुद्धा अनेकदा उत्तरच असतं. ह्या अजाणत्या वयाला जाणतेपणा येण्याचीच ही खूण नव्हे का.. ?

             नातं बिघडत केंव्हा..? जेव्हा वादाच्या भीतीने माणूस संवाद करायचा थांबतो. मनात चालणारा संवाद जेव्हा ओठांवर येण्यासाठी धडपडतो तेव्हा.. कारण नात्यामध्ये निर्माण होणाऱ्या बहुतेक समस्या ह्या कोणी 'काय म्हटलं' ह्यापेक्षा ते 'कसं म्हटलं' यामुळेच निर्माण होतात. 'काय म्हटलं' हे बुद्धीला कळत, 'कसं म्हटलं' हे मनाला लागतं. म्हणूनच त्या मनातील संवादाला एका ठराविक काळानंतर जेव्हा सुसंवादाची साथ मिळत असते तेव्हा ती घेऊन मनाला मोकळ करणं आपल्यासाठी आणि सभोवतालच्या परिस्थितीसाठी केव्हाही उचितच ठरतं. कारण त्या सुसंवादाने आपल्यामुळेच दुखावलेल्या समोरच्याच्या मनावर एक फुंकर मारल्या जाते किंवा कधी आपल्याही मनावर समोरच्याकडून नकळत अशीच फुंकर मारल्या जाते..
प्रेमाची.. विश्वासची.. अन् आपुलकीची..
            सतत आपल्या सोबत असणाऱ्या Smart Phone मधे  Junk Files वाढू नये म्हणून त्याला वेळोवेळी Clean  करणारे आपण ह्या  निसर्गतःच लाभलेल्या आपल्या Smart मनातील Junk Files Clean करण्यासाठी का विसरतो..? इतक्या Virtual जगात Reality चा आनंद शोधणारी ही Virtual Reality आपल्यामधे कोठून आली..? त्या Junk Files मुळे hang होणारा आपला Phone आपल्याला दिसतो मग त्या संवादाअभावी hang होणारं आपलं मनच आपल्या दृष्टीच्या पलीकडे कसं जात..? इतके दृष्टिहीन कधीपासून झालो आपण..?
अयोग्य INTENTION च्या भीतीपोटी योग्य INTENTION ही न पोहचवण हे तर खेळता येत असूनही हरण्याच्या भीतीने न खेळण असंच झाल नाही का..?  आणि म्हणूनच ह्या सगळ्यामध्ये त्या अहंकाराच पारड कुठे न कुठे इंचभर तरी जड ठरत. तो जर नसला असता तर हे प्रश्नच उद्भवले नसते. म्हणूनच चांगल्या INTENTION ने फुलवलेल्या नात्याला जेव्हा आपण आपल्याच अहंकारापासून जपतो तेव्हा ते नातं अजूनच बहरत. विश्वासू बनत. आपल्या चांगल्या INTENTION ने फुललेल्या नात्याला बहरलेल बघण्यासाठी आपल्याच So Called EGO ला शाबूत ठेवणं आणि तो न राहिल्यास एका ठराविक काळानंतर सुसंवादाची सुरवात आपणहून करणं ह्यातच आपली खरी कसोटी नव्हे का..? 
 
            Intentionally लिहिण्यासाठी सुरवात केलेल्या ह्या INTENTION च्या शीर्षकात मधेच  So Called EGO ची  Entry झाली आणि अनेक प्रश्नांची उत्तरे लिहिता लिहिताच मिळून गेली. सुरवात आणि शेवट कशी करायची ह्याच्या कोड्यामधे अडकलेला मी आता मात्र काही प्रमाणात तरी सुटलो अस म्हणायला काही हरकत नाही.. हो ना..?



                       - मकरंद 



                                             ©makarand92.blogspot.com 

बुधवार, ११ फेब्रुवारी, २०१५

शब्द - तुमच्या आमच्या मनांमधले.. ...

               खरंच खूप मजेदार आहे आपलं आयुष्य.. किती जणांनी किती काही लिहिलय त्याच्यावर.. स्वतःच्याच  अनुभवातून, बघण्यातून, ऐकण्यातून, समजण्यातून वगैरे वगैरे.. पण तरीही त्याच्यावर लिहिता येतच राव.. कधीही, कुठेही आणि कितीही..
               मी Diary लिहित होतो. किंबहुना अजूनही लिहितोच आहे. फक्त विषय भरकटला आणि त्याच्यासोबत मीही. अशा भरकटण्याची आता सवयच झालीये. अन्  भरकटलेले हे अनोळखी रस्तेच मला पुन्हा ओळखीच्या वळणावर आणून ठेवतायत. जणू काही त्यांना कळतय की मला कुठे जायच आहे ते..
               कधी कधी वाटून जात की खरच असा सरळ, Problems रहित, काळजीविरहित, एकदम मोकळा रस्ता माणसाच्या आयुष्यात नसतो का..? हे झालं की ते, ते झालं की हे, मग ह्यातलं काहीतरी अर्धवटच राहिलेलं असतं, त्यातलं काहीतरी मधेच डोकं वर काढत.. हे सतत चालूच.. आपलं संपल की दुसऱ्यांच आणि त्यांच संपल की पुन्हा आपलं.. हे अविरतच.. दिवसभरात आपल्याला एकट न सोडणारे 'हे' आणि 'ते' त्यांच्या जोडीदारांसहित स्वप्नातही कुठल्या रस्त्याने येतात देवच जाणे..
               मला चांगल आठवतय १०वी मध्ये असताना कोणीतरी म्हणलेलं  की हा आयुष्याचा  Turning Point आहे. १२वी ला ही पुन्हा तेच. नंतरही तेच.. आज मागे वळून बघितल्यावर कळतय की ''अरेच्चा.. ह्या Turning Points ची संख्या तर वरचेवर वाढतच जात आहे." आणि नंतर लक्षात आलं की शालेय जीवनानंतर घेतलेल्या एका वळणाने मात्र या रस्त्याला नागमोडी चालीची सवयच लावली. जणू काही Turning Points हे त्याचे अविभाज्य घटकच आहेत. कधी नको वाटणारे Turning Points अचानक पुढ्यात उभे राहतात. त्यामुळे मन चलबिचल होत, अस्वस्थ होत.. तर कधी जे Turning Points यावेसे वाटतात तेही लांबणीवर पडत जातात.. कदाचित कधीच न दिसण्यासाठी.. ??  मग पुन्हा मन चलबिचल होत, अस्वस्थ होत.. ह्या प्रत्येक भावनेत शब्द एकच असले तरी ती भावना मात्र वेगळीच असते. एकातून वाट शोधायची असते तर दुसऱ्यात शोधलेल्या वाटेवर चालण्यासाठीसुद्धा वाट पहावी लागते.. किती अजब आहे ना हे.. असो..
                 माणूस हा स्वार्थी प्राणी आहे ह्यात तसूभरही शंका नाही. कदाचित स्वतःच्या आनंदी भवितव्यासाठी तो जवळच्या लोकांच्या मनाशी खेळण्यास मागे-पुढे पाहणारही नाही. दिवसभर उपवासाने उपाशी असणाऱ्या व्यक्तीला पुढ्यात पंचपक्वान्नाच ताट दिसत तेव्हा त्याच्या मनात उपवासासंबंधी चालणारे मनाचे खेळ आणि 'त्या' माणसाच्या मनात जवळच्या लोकांच्या संदर्भात चालणारे मनाचे खेळ हे कदाचित सारखेच असावेत.. पण जो स्वतःच्या आनंदी भवितव्यासाठी जवळच्या लोकांरहित जगण्याऐवजी त्यांच्या सहित जगण्याचा प्रयत्न करतो तो लाखात एक असा लाखमोलाचा माणूस असतो. असा एक तरी आपल्या सोबत असावाच. आणि आपणही कोणासाठी तरी असं होण्याचा प्रयत्न करावाच.. हो ना..? असो..
                 Problems कोणाला नसतात.. ती चुकणाऱ्यातील गोष्टच नाही. ते आठवणीने आपल्याकडे येणारच. ठराविक अंतराने. जसा सकाळचा Mobile चा Alarm Snooze केल्यावर ठराविक अंतराने वाजत राहतो तसच ह्यांच आहे. त्यालातरी कायमच बंद करता येत. ह्यांच्यावर तसा प्रयत्न केला तर ते अजूनच जास्त संख्येने येतात. पण प्रत्येकाचे Problems वेगळे.. प्रत्येकाला वाटत की माझाच Problem सगळ्यात मोठा.. मग कधी कोणी भेटलं की त्याच्याशी Share करून ते मनमोकळे होतात. किती छान असत अशा लोकांच.. ज्यांच्यासमोर मोकळ होता येत त्यांच्यासमोर मोकळे तरी होतात. अन् काही असतात.. मनातील गोष्टी मनातच ठेवणारे.. ह्याला बोलू की त्याला बोलू च्या संभ्रमात अडकणारे.. कोणाचीतरी वाट पाहणारे.. ती वाट पाहणं, संभ्रमात अडकणं चांगल नसतं हे माहिती असूनही तसंच करणारे.. असो..
                  मागच्या वर्षभरात चुकून खूपच पुस्तके वाचल्या गेली. त्यामुळे आयुष्य कसं असतं आणि कसं जगावं हे Theorotically अनेकांच्या लेखनशैलीतून अनुभवता आलं. "आसान है, Be Positive, You are what you think, You are the creature of your own life" असे अनेक विचार अन् दृष्टीकोन ती पुस्तके वाचताना समोर होती. कितीही Problems आले तरी त्याला Enjoy करा असं म्हणणारे वाक्य वाचताना छान वाटत असली तरी Practically त्यांच्यामधला मतीतार्थ परिस्थितीनेच कळायचा. ह्या सगळ्या थोर लेखकांच्या दृष्टीने आपल्या आयुष्याकडे बघितले तरी आपले Problems हे संपणारे मुळीच नाहीयेत. त्याला हवा तो आपलाच दृष्टीकोन. या सगळ्यांच्या मदतीने तयार झालेला.. स्वतःचा असा..
PERFECTLY MATCH ONLY FOR OUR LIFE.. हो ना..?        
                 
                आज बरेच दिवसानंतर लिहीणं झालं.. लिहिता लिहिताच विषय भरकटला म्हणून.. वैयक्तिकातून सार्वजनिकाची सुरुवात कशी झाली ते मलाही उमगलं नाही.. पण लिहिलं की लिहिल्या जात हेच खरं.. म्हणूनच शब्दांच्या ह्या ओळींना विशिष्ट असं शीर्षक काय द्याव हे मलाही सुचत नाही. कारण हे तर साधेच शब्द.. तुमच्या-आमच्या मनांमधले.. 
बरोबर ना..?                  


                       - मकरंद

                                                      ©makarand92.blogspot.com

बुधवार, ३१ डिसेंबर, २०१४

शेवट अन् सुरुवात...

             असाच बसलो होतो. कानात Earphones अडकवलेले होते. मी एकटा असताना ते माझी साथ कधीच नाही सोडत. आजही त्यांनी ती सोडली नाही. एकच गाणं चालु होत. मागच्या एक-दोन तासांपासून.. Repeat Mode वर.. प्रकाश बाबा आमटे चित्रपटामधलं ते गाणं. "तू बुद्धि दे..तू तेज दे..नवचेतना..विश्वास दे.." ते गाणं इतका वेळ होऊनही बदलाव वाटत नव्हतं किंबहुना त्याच्या तोडीच गाणं माझ्याकडे नव्हतं.. तेवढ्यात माझं लक्ष भिंतीवर असणाऱ्या 'कालनिर्णय' कडे गेलं. नजरेचं, विचारांच आणि गाण्याचं Cocktail माझ्यासाठी नव नव्हतंच.. पण नजर स्थिरावली.. त्या कालनिर्णयवर.. त्याच्या 31 डिसेंबर वर.. आजच्या दिवसावर..
             गाण्याचा प्रत्येक शब्द आता काहीतरी वेगळच खुणावू लागला.. त्या प्रत्येक शब्दाचा अर्थ कालनिर्णयाच्या मागच्या 12 पानांमधील 364 दिवसांमधे सापडण्याचा अवखळ प्रयत्न ती नजर विचारांच्या साथीने करू लागली. तो प्रत्येक शब्द मला गेल्या वर्षभरात घडलेली एकेक  घटना आठवून देत होता. त्याला अनुसरुन असलेली.. त्या घटनेमधील मला, मीच त्रयस्थ होउन पाहत होतो. एखादी चांगली गोष्ट दिसली की मनात हळूच एक आनंदाची उकळी फूटायची. स्वतःचाच अभिमान वाटायचा. पण जेव्हा मी चुकलेलो आठवलो की कसतरीचं व्ह्ययचं.. मन स्वतःलाच सांगायचं 'अरे मक्या, किती साधी गोष्ट होती ती, अशी कशी चुकलास तू..? Next time be careful हा..' त्याच्या या कधी खडसावुन आणि कधी प्रेमाने धीर देण्याच्या सवयीमुळे जरासं हायसं वाटायच. ते मला कधीच सोडणार नाही आणि त्याने सोडल तर मीच राहणार नाही असं काहीसं मला वाटून गेलं..  कोणत्याही परिस्थितीमधे ते मला चुकीचा सल्ला देणार नाही ह्याची पुन्हा एकदा मला खात्री पटली आणि फक्त त्याच हे खडसावणं आणि प्रेमानं धीर देणं कळण्याची बुद्धि हवी याची जाणीवही झाली..
          कितीतरी गोष्टी मला त्या कालनिर्णयाच्या बारा पानांमधे दिसल्या.. त्याच्या प्रत्येक पानावर माझी वेगळीच आकृती मला दिसत होती. पण त्याहीपेक्षा माझ्यासोबत त्या पानांवर असणाऱ्या दुसऱ्या आकृत्याच माझं लक्ष स्वतःकडे आकर्षित करत होत्या. पहिल्या पानावरचा त्यांचा चेहरा पाचव्या-सहाव्या पानावर किती वेगळा दिसत होता. स्वतःच काम झाल्यावर त्या किती सहजतेने माझ्यापासून लांब गेल्या. कदाचित माझ्या अजाणतेपणात त्यांना जाणतेपणा दिसला असावा.
पण ह्या सगळ्यांमधे काही आकृत्या होत्या.. प्रत्येक पानावर..माझ्यासोबत.. स्वतःची ठेवण बदलली तरी मन न बदललेल्या ह्या आकृत्या.. त्यांना मी काय म्हणू..? Thank You हा शब्द खुपच तोडका वाटतो त्यांच्यासाठी.. पण तुमच्या आणि माझ्या आकृत्यांच्या मध्यबिंदुना जोडून ठेवणाऱ्या रेषेला अखंड ठेवण्याचं काम मी नक्की करेन.. अगदी शेवटपर्यंत..
           या सरत्या वर्षात एक खूप जवळचा मित्र मला मिळाला. विश्वासार्ह असा.. तो म्हणजे पुस्तकं.. खूप काही शिकवल त्यांनी.. अनुभव आणि पुस्तकं यांच्यासारख्या गुरु शोधुनही सापडणार नाही असं मला प्रकर्षाने जाणवलं.
'मृत्युंजयाच्या' 72 तासाने सहनशीलतेचा अविष्कार माझ्यासमोर ठेवला. 'युगंधराच्या' पारायणाने बुद्धीची अन् विचाराची क्षमता दाखवून दिली. 'प्रतिसादाच्या' रूपाने आध्यात्माचं, हनुमानचं एक वेगळच रूप माझ्यासमोर आलं.. आयुष्यातील कठोरता 'स्वामी' ने दाखवून दिली. चेतन भगतच्या 'Half Girlfriend' ने सातत्याच महत्व सहज भाषेतून अन् नेहमीच्या विषयाच्या धाटणीतून पटवून दिल. आणि वपुंनी...??
वपुंनी तर जीवनाला आकार देण्याचं काम केवळ शब्दांतून करून दाखवलं.. अप्रत्यक्षपणे प्रत्यक्ष जीवन जगायला शिकवल. या कालनिर्णयामधील पोकळ दिवस या सगळ्यांमुळे भरीव झाले. आणि म्हणूनच ते माझ्या जवळचे बनले.. त्यांच्या पुस्तकीरूपानेच...
         आनंदाच्या गोष्टीसोबत या 12 पानांमधे काही दु:खद घटनाही घडल्या..हसत-खेळत स्वभावाच्या, मला नकळत अनेक गोष्टी शिकवणाऱ्या, थोड्याश्याच सहवासात स्वतःच्या स्वभावाने मला आपलसं करून टाकणाऱ्या काही वडीलधाऱ्या माणसांच्या पुढच्या प्रेमाला मी कायमचाच मुकलो. त्यांच्या मिळणाऱ्या प्रत्यक्ष आशीर्वादाला मला आता
अप्रत्यक्षपणे अनुभवावं लागतय.. असो..
नसणाऱ्या माणसाच्या आठवणींमधे रमताना कसतरीच होत. ह्या 'कसतरीची' व्याख्या करताना मीही धड़पडतो.
म्हणूनच हा 'असोचा' आधार...
            त्या आधारानिशी मी या सगळ्या तंद्रीतुन बाहेर आलो.. आणि आता फक्त 31 तारीखच दिसू लागली.. एक वर्ष पुन्हा संपल.. खूप काही नवीन शिकायला भेटलं.. माझ्यातील एक वेगळच रूप माझ्यासहित अनेकांना पाहायला मिळालं.. स्वतःमधले असे रूपं पाहायला कोणाला आवडणार नाही..? मला तर नक्की आवडेल.. स्वतःला उलगडायला.. स्वतःला ओळखायला..अन् नावीन्याला अनुभवायला..
माझ्याजवळच पुढच्या वर्षाचं 'कालनिर्णय' ठेवलं होतं..त्याचा पहिला दिवस मला खूणावत होता.. येणाऱ्या अनेक नव्या क्षणांसाठी मन आतूर होत.. नव्या अनुभवांसाठी ते सज्ज होतं.. एका कालनिर्णयाच्या शेवटाने दुसऱ्याची सुरवात होत होती.. मनाला सहज एक विचार स्पर्शुन गेला की,"काय मागवं या नव्या वर्षाकडे स्वतःसाठी..??"
अन् तेवढ्यात कानात गाण्याचे शब्द घुमले..
"तू बुद्धी दे.. तू तेज दे.. नवचेतना.. विश्वास दे..."
           

                       - मकरंद

                                         ©makarand92.blogspot.com

                          
         

मंगळवार, १६ डिसेंबर, २०१४

वाढदिवस - एका घराचा...







                   मी स्नानाला जाण्याचा तयारीत होतो. तेवढयात माझं लक्ष स्वयंपाकघरात लावलेल्या White Board कडे गेलं. आज तो रिकामाच होता. रोजचं पंचांग आणि दिनविशेष लिहिण्याचा हा Modern फळा.. घराला शोभणारा.. आई-बाबांनी जाणूनबुजून लावलेल्या चांगल्या सवयीमधली ही एक..  घरात असणाऱ्या सगळ्यात लहानाकडे त्यावरचा मजकूर रोजच्या रोज लिहिण्याचं काम.. ठरलेलं.. अलिखित नियमच जणू.. अनेकांमधला एक..
मी घरी असताना ते काम माझंच असतं. म्हणून आजच्या दिवसाची तिथी पाहण्यासाठी मी कालनिर्णय गाठलं. ती होती.. मार्गशीर्ष कृ. ९, १६ डिसेंबर, मंगळवार.. मार्गशीर्ष कृ. ९ आणि मंगळवार सोडला तर १६ डिसेंबर ही तारीख मला एकदम Click झाली. माझ मन मलाच म्हणालं, " अबे मक्या, १६ डिसेंबर.. अद्वैतचा वाढदिवस.." हो.. खरंच.. आज त्याचा वाढदिवस.. १३ वर्ष पूर्ण झाले त्याला..
ते अद्वैत.. आमचं घर..      
                 आजही मला ह्या घरातील पहिली सकाळ आठवतीये. मी उठल्या उठल्या आईला विचारलं होत, अर्धवट झोपेतच.. "आई, मावशी कुठेय..?" आणि आई मला कुशीत घेऊन म्हणाली होती आपण मावशीकडे नाही आपल्या नवीन घरात आलोय. स्वतःच्या.. 
 त्या 'स्वतःच्या'  या एका शब्दात कितीतरी सामर्थ्य दडलं होत. समाधान देणारं ते सामर्थ्य.. एका शब्दामधे  सुद्धा माणसाला समाधान देण्याची किती ताकद असते ह्याच स्पष्टीकरण मला आज ते सगळे संदर्भ आठवताना कळत होत. स्नान-संध्या, पुजा, जेवण ह्या वर्तमानामधल्या क्रिया करता करता मी गेल्या १३ वर्षाच्या या 'अद्वैताच्या' भूतकाळात वावरत होतो. माझ्या खेळण्यामधल्या छोट्या गाड्यांना खडबडीत फरशीवरून मऊ फरशीवर चालवता येतंय आणि त्या सूरर..सुरर पळतायत हे बघून मला किती आनंद होत होता. ते पत्त्यांच घर आता खाली-वर नसणाऱ्या, एकाच रेषेतील फरश्यांवर किती छान उभं राहिल याच्या कल्पनेनेच किती खुश होतो मी.. छोट्या गोष्टीतही किती आनंद अनुभवायचो आपण त्यावेळी.. किती साध्या अपेक्षा असायच्या आपल्या.. माझ्या बालपणातील त्या अपुर्णांकी अपेक्षांना पूर्णांकी रूप देण्याचं काम किती सहजतेने त्या अद्वैताने पहिल्याच भेटीत केल होत. म्हणूनच मी त्याच्या प्रेमात पडलो होतो.
पहिल्या दिवसापासून ते ……….
                  २१ व्या शतकाच्या उंबरठ्यावर चालू झालेल ह्याच बांधकाम म्हणजे एक निराळाच अनुभव होता. पै पै साठवुन, स्वतःचा घाम गाळून, गरज पडली तेव्हा स्वतः काम करून त्या दोघांनी ह्याला स्वतःच्या लेकरासारखं वाढवलं. आमच्यासहित त्याच्या जडणघडणीमधे संस्कार त्याच्यावरही झाले. किंबहुना त्याने ते स्वतः आत्मसात केले. त्यांच्याकडे पाहून.. ते दोघे म्हणजे.. आई-बाबा.. चार भिंतीच्या या घराला खरं घरपण देणारं जोडपं.. 
                 वरिष्ठांमधल्या वरिष्ठापासुन ते कनिष्ठांपर्यंत सगळ्यांना स्वतःच मन मोकळं करण्यासाठी ह्याचीच बैठक सापडली. अर्थात त्या बैठकीला सजवणाऱ्या या दोघांचीही तितकीच महत्वपूर्ण भूमिका त्यात असायची आणि अजूनही असतेच.. "भिंतींना कान असतात" हा शब्दप्रयोग ह्या घरात कोणी तिसऱ्यानेही वापरला असेल अस मला वाटतही नाही. इतकी मोकळीकता त्याच्या बैठकीने ह्या लोकांना दिली.
स्वतःच्या वैयक्तिक गरजा न भागवता आधी 'ह्याला' परिपूर्ण करण्यात आनंद मानणाऱ्या या दोघांच्या स्वभावामुळे प्रत्येक वर्षी नावीन्यपूर्ण आणणारी एक तरी नवीन गोष्ट ह्याच्यासोबत घडायची. त्यामुळे दरवेळेस नवीन घरात राहिला आल्यासारखं वाटायचं. गेल्या १३ वर्षात ह्याचं नाविन्यपण तसूभरही कमी झाल नाही. उलट ते वाढतंच गेलं...
                प्रत्येक सुखदुःखाच्या क्षणी एक महत्वाचा आधार असतं ते हे अद्वैतच.. त्याच्या मधे आल की मन शांत होतचं. जणू काही त्या मनाची समजुत ह्यानेच काढलीये. आपल्यामध्ये सामावलेल्या प्रत्येक गोष्टीत सजीवतेचा भास करून देणं ह्या निर्जीव घराला कसं जमत असेल ना..? येणाऱ्या प्रत्येक माणसाशी जुळलेली त्याची नाळ त्या माणसाला पुन्हा पुन्हा त्याच्याकडे कशी खेचून आणते हे एक नवलच आहे. आईच्या शिस्तीत, बाबांच्या नीटनेटकेपणामधे आणि दिदिच्या मुक्तछंद स्वभावामधे फुललेल्या या अद्वैताने मात्र त्याचा एक हात माझ्या डोक्यावरून कधीच हटु दिला नाही. पहिल्या दिवसापासून माझी अन् त्याची जमलेली गट्टी केवळ आम्हा दोघांनाच माहितीये.
लोक घरात मौल्यवान वस्तू ठेवल्याने त्याला एकटं सोडत नाहीत. इथे हे घरच मौल्यवान असल्याने त्याला एकटं सोडावसं वाटत नाही. गेल्या १३ वर्षात क्वचित प्रसंग सोडले तर ते कधीच एकटं राहिल नाही. किंबहुना त्याला एकटं सोडलही नाही. त्याच्या सोबत जुळलेली आमची ही नाळ म्हणूनच आम्हाला त्याच्यापासुन दूर ठेवत नाही.. अन् त्याच्यापासून दूर जाताना हळवं केल्याशिवाय सोडतही नाही. दिदिच्या लग्नात सगळ्यात पहिले सजलेलं अद्वैतच होत अन् तिला निरोप देणारं पहिलही अद्वैतच.. एकमेकांच्या मिठीत लग्नाआधीच धाय मोकलुन रडणाऱ्या त्या दोघांना आठवलं तर आजही डोळ्यांमधले आसवे थांबण्याचं नाव घेत नाहीत. ते प्रेम वेगळंच असतं हो.. खुपचं वेगळं… असो..
               वेगवेगळे बिंदू असणारे आई-बाबा लग्नाच्या एका सरळ रेषेने गुंफले गेले. दिदिच्या जन्माने त्याला त्रिकोणी आनंदात परावर्तीत केलं. त्या अर्धवट वाटणाऱ्या त्रिकोणी कुटुंबाला चौकोनाचं पुर्णत्व देणारा ठरला तो माझा जन्म. वेगवेगळ्या रूपातील आम्हा सगळ्यांना एकरूप ठेवण्यासाठी कोणाचीतरी गरज होतीच. अन् म्हणुनच अद्वैताचा जन्म झाला. केवळ त्या एकरुपतेसाठी.. आमच्यामधल्या अद्वैतासाठी...
तो दिवस..

१६ डिसेंबर २००१ ते…………
                    मकरंद  

                                                                                ©makarand92.blogspot.com