शुक्रवार, २० ऑक्टोबर, २०१७

Advice.. सलाह.. सल्ला..!!

          4 वर्षांपूर्वी एका मार्केटिंग कंपनीच्या Seminar ला गेलो होतो. तेव्हा Stage वर एका तरुण मुलाची झोकात Entry झाली आणि त्याने सगळ्यांना एक प्रश्न विचारला.. "भारतात कोणती गोष्ट Free Of  Cost भेटते..?" सगळे विचारांत होते आणि Audience मधून एक जोरात आवाज आला.
Advice.. सलाह.. सल्ला..!!
          त्याच्या ह्या प्रश्नावर त्या वेळी मी जास्त विचार केला नव्हता. किंवा तसे अनुभव आले नव्हते. आले असतीलही पण ते कळाले नव्हते. आज असाच एक लेख वाचला आणि चार वर्षांपूर्वीची ती घटना आणि ह्या चार वर्षांमधले या बाबतीतले अनेक अनुभव झर्रर्रकन डोळ्यासमोरून गेले. त्याने विचारलेल्या प्रश्नामध्ये आणि दिलेल्या उत्तरामध्ये  खरंच तथ्य होतं. अख्या भारताचा विचार सोडाच पण वैयक्तिक जीवनात आपल्याला पावलोपावली असे सल्ले मिळतात. पूर्वीच्या काळी लोकांच्या अनुभवातून ते एकमेकांना सल्ले देत असतं. त्यामुळे कदाचित त्यांचं पालन होत असावं. आजच्या ह्या Social Media च्या काळात अनेक सल्ले हे ''केवळ ऐकण्यातून,वाचण्यातून" दिलेले असतात. त्यामुळे त्यांच्या विश्वासार्हतेवर साशंकतेची तलवार टांगते.
असो..
        एखादी गोष्ट मागणं आणि देणं यातं मागणंच खूप अवघड आहे. मागताना मनात कमीपणाचा भाव असतो. देताना मात्र मनाचा मोठेपणा लागतो. सल्ल्याचा बाबतीत हे तितकंसं खरं ठरत नाही. तो मागताना "गरज" असते, देताना मात्र "कौशल्य" अंगी असाव लागत. बहुतांश वेळी आपण आपल्या अनुभवातून, आपण गेलेल्या परिस्थितीतून सल्ला देतो. पण ज्याला गरज असते त्याची परिस्थिती, त्याला येणारा अनुभव हा आपल्यापेक्षा नक्कीच वेगळा असू शकतो. म्हणून त्याला समजून घेण्यासाठी लागणारा "संयम" आणि त्यानंतर विचाराअंती दिला जाणारा "सल्ला" हा कौशल्यानेच दिला जाऊ शकतो.
               शौनक अनेक दिवसांपासून  वेगळ्याच विचारात, संभ्रमित अवस्थेत होता. त्याला त्याच्या मनात चालणारे वेगवेगळे खेळ कोणालातरी सांगायचे होते. ज्यांना सांगण्याचा प्रयत्न त्याने केला त्यांनी त्याला लगेच त्यावर उत्तर देऊन त्याचे समाधान करण्याचा प्रयत्न केला. पण त्याचे ते खेळ काही थांबले नाहीत. एके दिवशी तो त्याच्या काकांकडे गेला. काका फार "विवेकी" स्वभावाचे होते. त्यांनी त्याची सगळी कैफियत ऐकून घेतली आणि काहीच बोलले नाहीत. त्यानेही मी काय करू असा प्रश्न विचारला नाही. तो काकांजवळ मन मोकळा झाला. काही वेळानंतर तो निघून गेला. हसत हसत.. मोकळ्या मनाने..
               शौनक मोकळा होण्यासाठीच आला होता. त्याला सल्ला नकोच होता. पण आजपर्यंत तो त्याला मिळत गेला. त्याला मनातलं ऐकून घेणारं कोणीतरी पाहिजे होतं. ते त्याला काकांच्या रूपाने मिळालं.
               साहिलचा स्वभाव मात्र काकांच्या विरुद्ध होता. तो सदानकदा ज्याला त्याला त्याने काय करावं, कसं करावं सांगत असे. पहिल्यांदा आप्तेष्टांनी, मित्रांनी, लोकांनी त्याला ऐकून घेतलं. पण नंतर  मात्र तो त्यांना नकोसा वाटत होता. फक्त नको तेव्हा सल्ला दिल्याने.. काका त्यांच्या ऐकून घेण्याच्या स्वभावामुळे लोकांच्या मनात स्वतःच्या नकळत घर करून बसले. साहिल मात्र त्यांच्या मनातून दूर जातच राहिला. कायमच.. फक्त नको असलेला सल्ला दिल्याने..
               वपु म्हणायचे हवा असलेला माणूस त्यावेळी न मिळणं म्हणजे नरक. मला वाटतं "कोणी काय करावं हे त्याने विचारल्याशिवाय सांगणं हा ही नरकच.." म्हणून सल्ला देतानाही कौशल्य लागतं. सल्ला मागणारा संभ्रमित अवस्थेत असतो. आपण आपल्या अनुभवाचे अर्धवट तपशील आठवतील तसे सांगून त्याच्या या अवस्थेत अजूनच संभ्रम निर्माण करत असतो. त्याची पार्श्वभूमी, त्याची जडणघडण झालेली स्थिती, त्याची वैचारिक क्षमता या सगळ्याचा आपण विचारही करत नाही आणि सल्ला देऊन टाकतो. एखाद्याला दिलेल्या सल्ल्याचे त्याच्यावर काय परिणाम होतील ह्याची आपल्याला काहीच चिंता नसते. तो दिलेला सल्ला Successful झाला तर Credit मिळवण्याची घाई असते. " बघ, म्हणलं होत ना, असं केल्यावर होऊन जाईल म्हणून" असे वाक्य आपसूकच निघून जातात. हेच ते Credit असतं. पण Failure आलं तर ,"अरे असं नव्हतंच करायचं, हे थोडस चुकलंच तुझं" म्हणून आपण पळवाट शोधतोच. हे प्रत्येकासोबत घडतं. कदाचित आपणही अश्यांमधलेच एक असू. म्हणून सल्ला न देणं कधीही चांगलेच.
              पण....
एवढ्या वर्षांची आपल्या समाजाला लागलेली ही सवय अशी लगेच जाणं शक्यच नाही. म्हणून सल्ला द्यायचाच तर तो कृष्णासारखा द्यावा. अर्जुनासमोर सगळे गुरु आणि त्याचे बंधू युद्धासाठी थांबलेले असताना, संभ्रमित झालेल्या अर्जुनाला "उठ आणि युद्ध कर" असा आज्ञावाचक, ठाम, निश्चयी सल्ला कृष्णाने दिला होता. "उठलास तर बरं होईल आणि जमल्यास युद्धही करता येईल, हा सुद्धा पर्याय आहे असं मला वाटतं" असा सल्ला त्याने अर्जुनाला दिला असता तर गीतेतून मिळणारी शिकवण आपल्याला कधीच मिळाली नसती. त्या ठाम, निश्चयी सल्ल्याने अर्जुनाला धीर आला, तो युद्ध नुसताच लढला नाही तर जिंकलाही. कारण कृष्ण त्याच्या पाठीशी आहे हे त्याला माहिती होते. ही त्या सल्ला देणाऱ्याची भूमिका असावी.
आपल्यासारखी नक्कीच नव्हे..
              जेव्हा जेव्हा माणसाच्या हातात नेतृत्व येतं तेव्हा तो सगळं आपल्याच पद्धतीने करण्याचा विचार करतो. म्हणून "नेतृत्व आलं की सल्ला देणं ही आपसुकचं येतं." आणि आपल्या सोबतच्या, आपल्यापेक्षा कनिष्ठांनी सांगितलेली गोष्ट आपल्याला पटेनाशी होते. उलट त्यांनी कसे करायला हवे हा सल्ला आपल्याकडे तयारच असतो.
             नोकरी, आजच्या Corporate Industry मधे, IT Industry मधे आलेले असे अनेक अनुभव आपल्या दिमतीला आहेतच.  पण आपल्यापेक्षा वयाने, अनुभवाने, पदाने लहान असलेल्याचा सल्ला हा त्याच्या अनुभवानुसार, क्षमतेनुसार कधी कधी आपल्यालाही लागू होतो. रावणाचं वर्चस्व बघून एकवेळ रामही हतबल झाला होता आणि तेव्हा इंद्राने दिलेला सारथी मातली याने "प्रभू, रावणाचा अंत जवळ आला आहे, तुम्ही गोंधळून का जाता, तुमच्याकडे असणाऱ्या पितामहास्त्राचा वापर कधी करणार" असा योग्य शब्दांत  अचूक सल्ला दिला होता. म्हणून सल्लागार हा मातलीसारखा असावा. त्याने सल्ला घेणाऱ्याचा आत्मविश्वास वाढावा. शल्यासारख्या कर्णाला त्याचे दोष दाखवून संभ्रमित अवस्थेत टाकणारा नक्कीच नसावा.
            शौनकला असं बोलण्यासाठी "संयमी" काका भेटले. अर्जुनाला "धीर देणारा" कृष्ण भेटला. रामाला "आठवण करून देणारा" मातलीसारखा  सारथी  भेटला आणि मला माझेच "डायरी आणि पेन" हे जुने सोबती पुनःश्च भेटले. म्हणून आज हे मनातलं बोलावसं वाटलं आणि म्हणूनच हा सगळा खटाटोप..
त्यांच्या साथीने.. त्यांच्यासोबत.. सल्ला नक्कीच नव्हे...


                                          - मकरंद


                                                                                           ©makarand92.blogspot.com




























कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत: